कविता लिहिताना- श्रीधर तिळवे
ही भाषा मेली स्त्रीलिंगीच आहे
तो प्रॉब्लेम नाही
पण ती पुरुषसत्ताक वडाभोवतीच फे-या मारते
आणि जन्मोजन्मी हाच पती मागते
हा प्रॉब्लेम आहे.
तिला कितीदा समजावलं
कविता लिहिणं म्हणजे वटपौर्णिमा साजरी करणं नव्हं
परंपरेचं सूत नाकासमोर धरुन चालण्यात
कसली आलीये स्त्रीशक्ती?
पण तिच्या फे-या मारणं सुरुच
आणि पुरुषांच्या पारंब्या पकडून
सूरपारंब्या खेळणंही सुरुच
आता सुरुवातच अशी तर शेवट काय होणार?
म्हणूनच मी आख्खा वडच उलट करुन
कवितेत लटकवून दिलाय
ब्रह्मांड उलटं टांगलं
की स्त्री सुलटी होते हा माझा अनुभव आहे
कविता लिहिताना
एवढं शहाणपण ठिकाणावर असलंच पाहिजे की,
-श्रीधर तिळवे
Subscribe to:
Post Comments (Atom)
खणखणीत. आभार.
ReplyDelete